योग्य वेळी योग्य पद्धतीने आर्थिक गुंतवणूक केल्यास आपली उद्दिष्टे सहज साध्य होऊ शकतात. त्यासाठी आपल्या उत्पन्नाच्या आधारावर कशी, कुठे गुंतवणूक करावी याची सविस्तर माहिती आजच्या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
.......
श्री. अंकुश सातव याची नुकतीच एका लग्नसमारंभात भेट झाली मी गुंतवणूक सल्लागार आहे, हे त्याला समजताच त्याने आर्थिक नियोजनाबाबत माझ्याशी चर्चा केली व भेटीची वेळ ठरवून दोन दिवसांनी ऑफिसमध्ये भेटण्यास आला. त्याचे आर्थिक उत्पन्न आणि त्याच्या उद्दिष्टांनुसार आखलेला आर्थिक नियोजनाचा आराखडा याची सविस्तर माहिती या लेखात घेऊ या.
अंकुश सातव हा २८ वर्षाचा युवक. त्याचे १२वीपर्यंतचे शिक्षण झाले असून सहजासहजी नोकरी मिळण्याची शक्यता न वाटल्याने ७-८ वर्षांपूर्वी त्याने रिक्षाव्यवसायास सुरूवात केली. दोन वर्षापूर्वी बँकेचे कर्ज घेऊन स्वत:ची रिक्षा घेतली. सध्या त्याला दरमहा सुमारे पंचवीस ते तीस हजार रुपये इतके उत्पन्न मिळते. पत्नी शुभांगी (वय२४) व मुलगा अथर्व (वय २) असा परिवार आहे. पत्नी घरगुती खाद्यपदार्थ तयार करून (उदा: पापड, चकली, चटण्या ) जवळपासच्या दुकानास नियमित पुरवीत असते यातून तिला दरमहा सुमारे आठ ते दहा हजार रुपयेइतकी कमाई होते. असे एकूण सुमारे ३५ ते ३७ हजार रुपये एवढे उत्पन्न या कुटुंबाचे आहे, तर दरमहाचा खर्च साधारण वीस हजार रुपये आहे.
सातव याच्या गुंतवणुकीबाबत विचारले असता, त्यांनी कुठलीही विमा पॉलीसी घेतली नसल्याचे तसेच; बँक अथवा पोस्टात काहीही गुंतवणूक केलेली नसल्याचे सांगितले.
आर्थिक गुंतवणुकीबाबत फारशी माहिती नसल्याने बँकेत खाते असून गरजेनुसार रक्कम काढली जाते व उर्वरित शिल्केवर सेव्हिंग दराने (३.५%) इतके व्याज मिळते. या खात्यावर सरासरी दहा ते बारा हजार रुपये इतकी शिल्लक असते. अधून मधून सोने खरेदी केली जाते ;आत्तापर्यंत सुमारे ५० ग्रॅम सोने खरेदी केले असल्याचे सातव यांनी सांगितले. भविष्यातील उद्दिष्टाबाबत विचारले असता, मुलाला इंजिनिअर करण्याचा मानस असून ५ वर्षांनंतर कार घेऊन ओला किंवा उबरचा व्यवसाय करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. निवृत्तीबाबत काही विचार केला आहे का, असे विचारले असता याबाबत विचार अद्याप केला नसल्याचे सातव यांनी सांगितले.
ही सगळी माहिती बघता, खरे तर अंकुशने आर्थिक नियोजनाबाबत त्वरित गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. दरमहाचे सरासरी ३५ ते ३८ हजाराचे उत्पन्न व २० हजाराचा खर्च पाहता १५ ते १६ हजाराची गुंतवणूक करणे शक्य आहे. किमान दहा हजार रुपयेइतकी नियमित गुंतवणूक करणे सहज शक्य आहे. त्यांचे वय विचारात घेता गुंतवणुकीसाठी भरपूर कालावधी उपलब्ध आहे. नियमित गुंतवणूक केल्यास उद्दिष्टे साध्य करणे सहज शक्य होईल.
आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने त्याने सर्व प्रथम किमान ५० लाखाचा टर्म प्लॅऩ त्वरित घेणे आवश्यक आहे. टर्म प्लॅऩ ऑन लाईन घेतल्यास अंदाजे ५ हजार इतका वार्षिक प्रीमियम असे केल्याने पुढील ३० वर्षे हे विमा कव्हर मिळेल व यामुळे आपत्कालीन मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक समस्येची तरतूद होऊ शकेल. यानंतर मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीने दरमहा १५०० रुपयांची एसआयपी (डायव्हर्सीफाइड म्युच्युअल फंडात) करावी व ती येथून पुढे १५ वर्षे नियमित चालू ठेवल्यास मुलाच्या शिक्षणाची त्यावेळच्या खर्चाची तरतूद होऊ शकेल. वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्ती व ८० वर्षाचे आयुर्मान गृहीत धरल्यास दरमहा साडेतीन हजार रुपये इतकी रक्कम ईसीएसद्वारा एनपीएसमध्ये पुढील ३२ वर्षे गुंतविल्यास आजच्या पंधराहजार मूल्याची रक्कम वयाच्या ८० वर्षांपर्यंत मिळत राहील. थोडक्यात निवृत्ती नंतर आर्थिक समस्या राहणार नाही.
पाच वर्षांनंतर कर्ज न घेता कार घेण्यासाठी आजपासून पुढील ५ वर्षे दरमहा आठ हजार रुपयांची एसआयपी (डायव्हर्सीफाइड म्युच्युअल फंडात) करावी. यातून पाच वर्षांनी सुमारे सात लाख मिळू शकतील.
याप्रमाणे गुंतवणुकीचे नियोजन केल्यास मुलाचे शिक्षण, रिटायरमेंटची आर्थिक तरतूद व नवी कार घेणे ही तीनही उद्दिष्टे सहज साध्य होतील.यासाठी दरमहा १३ हजार रुपये एवढी गुंतवणूक नियमित करणे गरजेचे आहे. अंकुशचे दरमहाचे एकूण उत्पन्न व खर्च पाहता हे सहज शक्य आहे. असे आर्थिक नियोजन करण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीशीही याबाबत चर्चा करणे आवश्यक आहे जेणेकरून तिचाही या नियोजनात सक्रीय सहभाग असेल.
- सुधाकर कुलकर्णी (लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)
(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल.)